शिक्षण विषयक चिंतनाचा वेध   

ऐसपैस शिक्षण,संदीप वाकचौरे 

सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षक यांच्याकडे गेले काही वर्ष सातत्याने नकारात्मतेने पाहिले जात आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आक्षेपही नोंदवला जातो; मात्र तरीसुद्धा राज्यात सरकारी शाळांमधील शिक्षकांनी एकत्रित येऊन विविध प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणामही दिसून येतो. राज्यातील काही शिक्षकांनी एकत्रित येऊन नव्या युगाची आव्हाने लक्षात घेऊन जागतिक स्तराला सामोरे जाण्यासाठीचा विद्यार्थी घडवण्यासाठीची पाऊले पडावीत, शिक्षकांच्या मनामनात पेरणी व्हावी म्हणून शिक्षक प्रयत्न करत आहेत. नवी आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठीच्या वाटा, यासंदर्भाने चर्चा घडवण्यासाठी सतत नवमाध्यमाचा उपयोग करत रोज बैठका, चिंतन आणि संवाद घडवला जात आहे. त्या वाटा चालणार्‍या शिक्षकांनी ‘वेध’ नावाने समूह स्थापन केला आहे. त्यांनी जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षणाचा विचार घेऊन गेले काही वर्ष सातत्याने एकत्र येत आहेत.
 
राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे माजी प्रधान सचिव नंदकुमार यांची प्रेरणा घेऊन निलेश घुगे यांनी संघटन करून हा समूह बांधला. हा समूह भविष्याच्या दृष्टीने जगातील शिक्षण व्यवस्थेत बदल घडू पाहतो आहे. शैक्षणिक परिवर्तनासाठी स्वतःची पदरमोड करत सरकारी शाळांमधील शिक्षक तीन दिवस शिक्षण विषयक चिंतन करण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करते. त्यात राज्यातील विविध ठिकाणचे शिक्षक सहभागी होतात. नवी आव्हाने पेलण्यासाठी चैतन्याची उंच भरारी घेत आहेत. ही गोष्ट निश्‍चित प्रेरणादायी म्हणायला हवी. राज्यात गेले काही वर्ष अशा स्वरूपाचे काही शिक्षकांचे गट समाजमाध्यमाद्वारे एकत्रित येऊन विचाराची देवाणघेवाण करत आहेत. ही प्रकाशाची बेट आपापल्या परिने ज्या वाटा चालत आहेत, त्या प्रवासाने भोवतीचा अंधार निश्‍चितच दूर करेल, असा विश्‍वास आहे. मुळात शिक्षणातील परिवर्तनाच्या वाटांचे सार्वत्रिकीकरण कधीच होत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गुणवत्ता राहात नाही हे वास्तव आहे. त्यासाठी भारावलेले, प्रेरक असलेले शिक्षकांचे संघटन महत्त्वाचे असते. तो विचार घेऊन काम करणे अधिक महत्त्वाचे आहे.
 
दिशादर्शक चिंतन
 
वेध परिवाराच्या वतीने शेगाव येथे तीन दिवसाच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या संमेलनात अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला. त्यांनी केलेले चिंतन, मनन शिक्षकांना दिशादर्शक ठरेल. भारतीय जैन समाजासाठी दिशादर्शक काम करणारे आणि संस्थेचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी वेध परिवार, त्यासाठी झटणारे नंदकुमार यांच्याबद्दल गौरवोद‍्गार काढले. एक ध्येयवेडी व्यक्तीच या मार्गाने प्रवास करू शकते. आनंददायी शिक्षण पद्धती सुरु करणे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. नियत साफ असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर सर्व गोष्टी शक्य होतात. त्यांची प्रेरणा फक्त विचारातूनच नाही, तर कृतीतूनही दिली जाते. वेध संमेलन हा लक्षवेधी कार्यक्रम आहे. या समूहाचे प्रेरक असलेले माजी प्रधान सचिव नंदकुमार यांनी जगातील प्रत्येक माणूस शिकला पाहिजे म्हणून भूमिका प्रतिपादन केली आहे. त्यासाठी ते काही प्रयत्न करू पाहत आहेत. २१व्या शतकासाठीचा विद्यार्थी घडवायचा आहे. त्यासाठीची तयारी प्रत्येकाने केली पाहिजे. आव्हाने स्वतः पेलण्याची गरज आहे आणि त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न देखील प्रत्येकानेच करणे गरजेचे आहे.
अनुभव कथन
 
शिक्षणाच्या प्रक्रियेत असूनही काही माणसे वेगळ्या वाटा चालत आहेत, त्या वाटांचे प्रवासी असलेले बाबू मोरे या खोमारपाडा या आदिवासी पाड्यावरील शिक्षकाने ‘मनरेगा’च्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांनी थांबवलेले स्थलांतर आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची साधलेली शैक्षणिक प्रगती ही अत्यंत कौतुकास्पद होती. आरंभी कुकुटपालन, फळबाग शेती, फळभाज्या अशा विविध मार्गाने तेथील आदिवासी बांधव लखोपती करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश मिळाले आणि पालकांचे स्थलांतर रोखले गेले. मुले वर्षभर शाळेत येऊ लागली. गुणवत्ता वाढली. क्वेस्ट संस्थेचे शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत असलेल्या आरंभिक साक्षरतेचे शिक्षण काही नवीन संकल्पनांचा विचार मांडला. त्यादृष्टीने विविध उदाहरणांची मांडणी करत नवे आव्हान पेलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. त्याबरोबर निपुणच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीच्या तयारीच्या संदर्भाने अत्यंत वास्तव दर्शन घडवले.
 
आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभारणारे दत्तात्रेय वारे यांनी शिक्षकांच्या मनात नवा आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम केले. संकट येतात; मात्र ती माणसाला अधिक सक्षम करून जातात. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे नामोहरम न होता, आपणच संकटे पेलण्याची तयारी ठेवायला हवी, असे मत व्यक्त केले. संकटांशिवाय अचुकता आणि टोकदारपणा येत नाही, वेगळा विचार करत नाही. स्वीडन, सिंगापूर व फिनलंड या देशांतील शिक्षण प्रक्रियेपेक्षा वेधचा समूह अधिक चांगले विचार जास्त मांडत असतात. आपल्यापुढील आव्हाने कोणती होती व त्यावर कसा मार्ग काढला याचे अनुभव कथन केले.
 
जितेंद्र राठी यांनी वेध संमेलनामध्ये येण्याचा हेतू, वेध दृष्टी नेमकी काय असेल या दृष्टीने पेरणी करण्याचा प्रयत्न करत उपस्थितांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. वेध परिवाराचे संघटक निलेश घुगे यांनी ऑनलाइन प्रशिक्षण एल.एम.एस आणि कोर्स विकसन याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष समोरासमोर शिकवले जाणारे अभ्यासक्रम वेगळे असतात, तर आभासी अभ्यासक्रम वेगळे असतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आपला वेध विचार हा जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी आपल्याला आभासी अभ्यासक्रम विकसित करावे लागतील. मुख्यत: हे समजून घेतले जायला हवे की, प्रशिक्षणाची काय गरज आहे? ज्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? गरजाधिष्ठित विश्‍लेषण कसे करतात? त्यानंतर पुढे काय? आशय विश्‍लेषण, अध्ययन निष्पत्ती, उद्दिष्ट कसे असावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
संतोष बोथे यांनी बदलते तंत्रज्ञान आणि शिक्षण या संदर्भाने मांडणी करताना प्रत्येक भारतीय हा एक शास्त्रज्ञ आहे. कौशल्य, तर्क आणि संयम या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत ते शास्त्रज्ञ आहेत. समस्या निराकरण, चिकित्सक विचार या गोष्टी आपल्यामध्ये आहेत; परंतु असे असूनही शिक्षणाची अवस्था काय आहे? प्रत्येक जण गोंधळलेला दिसत आहे. यामध्ये काय चुकते? हे आपल्याला शोधले पाहिजे. पंचेंद्रिय उघडी ठेवली पाहिजे असे आवाहन केले. ९५ टक्के लोक हे त्यांच्या नापसंतीच्या क्षेत्रात काम करतात. एआय तंत्रज्ञान शिक्षकाला पर्यायी ठरेल का? यावर चर्चा घडवून आणली. अनुप यादव यांनी रोबोटिक आणि कोडींग या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये लागणार्‍या साहित्याची ओळख करून दिली. संदीप वाकचौरे यांनी चला लिहिते होऊया या विषयावर मार्गदर्शन केले. मुळात लिहिते होण्यासाठी आधी वाचले पाहिजे. लिहिण्याची दृष्टी असली पाहिजे. वर्तमानपत्र, नियतकालीके, पुस्तके वाचायला हवीत. वाचनाने ज्ञानाची समृद्धता वाढते. दोन ओळीतला अर्थ वाचणे म्हणजे वाचन. शब्द वाचणे म्हणजे वाचन नव्हे. शब्द संपत्ती वाढते. शब्दाच्या उत्पत्तीपर्यंत जाणे. शब्दाचा अर्थ समजला की, लेखन अधिक समृद्ध होते. कल्पनाशक्ती वाढते. या हृदयीचे त्या हृदयी जेव्हा होते तेव्हाच तो संवाद होतो. अवांतर वाचन दृष्टी मिळते. एकाग्रता वाढते. स्मरणशक्ती चांगली राहते. स्वतःची लेखनशैली विकसित करा. विषयावर पकड असावी. आत्मविश्‍वास, मोकळेपणा असावा. त्या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे, संदर्भ माहीत असणे, उत्पत्ती कोश, समग्र अभ्यास लेख लिहिण्यासाठी तयारी, लेखाची रूपरेषा तयार करणे, उपमुद्दे तयार करणे, लेख कोणासाठी लिहितो हे महत्त्वाचे. भाषेची शुद्धता, शैक्षणिक लेखांमध्ये पुरावा, आकडेवारी असावी. अनावश्यक वर्णन टाळत लेखनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अक्षय यांनी वेधच्या पुढील प्रवासाविषयी विवेचन केले. वेध परिवारामध्ये काम करत असताना आपण प्रत्येक जण एकमेकांशी जोडलेले आहोत. एकमेकांच्या मदतीने आपल्याला कसे पुढे जायचे आहे याविषयी विवेचन केले. जागतिक स्तरापर्यंत पोहोचायचे असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? यावर चर्चा, विचार मंथन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या वेध प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मेंदू खेळ व मोकळीका या पुस्तकाविषयी कुसुमताई कच्छवे व जितेंद्र राठी यांनी भूमिका प्रतिपादन केली. शंभर टक्के मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे हा वेधविचार आहे. माणूस जिवंत ठेवणारा समूह आहे. रुळलेल्या वाटेवर जाताना यश मिळत नाही, तेव्हा नव्या वाटा शोधल्या जातात. दृष्टी बदला एखादे स्वप्न पेरणे ते स्वप्न सत्यात उतरवणे यासाठी हे आजचे संमेलन आहे. शिक्षकांनी लिहिलेल्या घेतलेल्या अनुभवाची मांडणी करत, त्यांच्या प्रयोगाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी मासिकाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
 
खरेतर अशा स्वरूपाचे शिक्षण संमेलन शिक्षक दिवसभर बैठक मारून बसतात आणि ज्ञानग्रहनासाठी अनेक किलोमीटर अंतर चालत येतात हे नेमके कशासाठी? असा प्रश्‍न कोणालाही पडणे साहजिक आहे; मात्र हे घडते आहे हे विशेष. सरकारी शाळेतील शिक्षकांनी ही चालवलेली सक्षमीकरणाची मोहीम निश्‍चित इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे. शिक्षकांचे असे समूह जितके वाढत जातील, तितक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे विश्‍व विस्तारत जाणार आहे. त्यासाठी सरकारी पातळीच्या पलीकडे होणारे प्रयत्न निश्‍चित दखलपात्र ठरत आहेत.

Related Articles